Skymet weather

[Marathi] व्यवस्थापकीय संचालक स्कायमेट ,जतिन सिंग: १७ ऑगस्ट पासून पुढील तीन आठवड्यापर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज, पूर्व आणि उत्तर भारतात सामान्य हवामानाची स्थिती, केरळ, कर्नाटक, कोकण ,गोवा आणि गुजरातमध्ये पुरस्थितीपासून सुटका, मुंबईमध्ये पावसामुळे कोणतीही आपत्तीजनक स्थितीची शक्यता नाही

August 14, 2019 9:40 AM |

Monsoon in India

स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार गेल्या आठवड्यात पावसाने देशाच्या मध्य भागात दाणादाण उडविली. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. महाराष्ट्रातील विशेषतः सांगली, नागपूर, कोल्हापूर, अकोला आणि महाबळेश्वर या ठिकाणी परिस्थिती गंभीर होती. एनडीआरएफ चे पथक अजूनही पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करत आहेत.

देशातील पर्जन्यमान कमी श्रेणीतून सामान्य श्रेणीत आले आहे. स्कायमेटकडे असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार १ जून ते १२ ऑगस्ट दरम्यान देशात ५६० मिमी सामान्य पावसाच्या तुलनेत ५५८ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य भारत हा मुख्य लाभार्थी ठरला असून येथे पावसाचे आधिक्य १३% आहे. दक्षिणेकडील द्वीपकल्पामध्ये पावसाचे आधिक्य ५% आहे. याउलट पूर्व आणि ईशान्य भारतात अजूनही पावसाची कमतरता १५% आहे. देशातील विभागवार पर्जन्यमान खालील सारणीत दर्शविले आहे.

Rainfall deficiency

दीर्घकाळासाठी कोरडे वातावरण

आता, देशामध्ये दीर्घकाळासाठी कोरडे वातावरण असणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असला तरी त्याचा परिणाम अल्पकाळ टिकेल. तसेच १३ आणि १४ ऑगस्ट दरम्यान ही प्रणाली मध्य भारतावर परिणाम करेल व कमकुवत होईल. त्यानंतर (१७ ऑगस्टनंतर) देशभरात मान्सूनचा जोर कमी होईल आणि जवळपास तीन आठवड्यांपर्यंत असेच वातावरण कायम राहील. कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथाशी सरकल्याने या काळात होणारा पाऊस मुख्यत्वे ओडिसा, बिहार आणि पूर्व उत्तरप्रदेश यासारख्या देशाच्या पूर्वेकडील भागांपर्यंत मर्यादित राहील.

पावसाची तीव्रता मध्यम असण्याची शक्यता असल्याने या वेळी बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात पुरस्थितीची शक्यता नाही. पश्चिमेकडील घाट जेथे मुसळधार पाऊस पडला होता तेथे पावसाचे प्रमाण आता कमी होईल. दक्षिणी द्वीपकल्पात देखील या आठवड्यात सौम्य हवामान विषयक गतिविधी राहतील. तथापि, ईशान्य भारतासह वायव्य भारतात थोड्याफार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जोरदार पावसास कारणीभूत ठरलेली सक्रिय हवामान प्रणाली आधीच कमकुवत झाली आहे. आठवड्याच्या अखेरपर्यंत पावसाचे प्रमाण अजून कमी होईल. या काळात देशात पावसाचे प्रमाण सामान्य किंवा सामान्यच्या जवळपास असेल. परंतु पुढच्या आठवड्याच्या सुरूवातीस, कोरड्या वातावरणामुळे पावसाची कमतरता वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवडा देखील कोरडा असणार असल्याने देशभरात १७ ऑगस्ट पासून तीन आठवड्यांसाठी कोरडे हवामान असणार आहे.

मुंबईत आपत्तीजनक परिस्थिती नाही

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये देखील या आठवड्यात पावसाळी गतिविधी कमी होतील. मुंबईत अतितीव्र पावसाची शक्यता कमी आहे परंतु किनारपट्टीचा भाग असल्याने जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या आठवड्यातही शहरात मुसळधार आणि व्यापक पाऊस पडला नव्हता, तर काही तुरळक ठिकाणी थोड्या कालावधीसाठी मध्यम पावसाची नोंद झाली होती.

पिकांवर परिणाम

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी आलेल्या पुरामुळे भातासारख्या पिकाला धोका असल्याने शेतातील जादा पाण्याचा उपसा करण्याची तातडीने गरज आहे. कोरड्या हवामान स्थितीमुळे हे काम करण्यास शेतकऱ्यांना नक्कीच मदत होईल. दुसरीकडे, कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीत सांगायचे तर शेतीत जरी पाणी साचले असले तरी हे पाणी त्यांच्या वाढीस मदत करेल. पूर्व भारतात जेथे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तेथे शेतकऱ्यांनी शेतातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करायला हवी. हीच खबरदारी इतर धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनीही घ्यायला हवी. दरम्यान उसाचे पीक जास्त पाण्याचा प्रतिकार करू शकेल.

Image Credits – The Hindu Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try